Wednesday, 17 October 2012

स्मृतीचिन्ह

वाचनालयातून फोन आला तशी माझी तारंबळच उडाली. "झालं का स्मृतीचिन्ह तयार" !! ????.........
दोन मिनिटं कळलंच नाही; कोण आणि कशाबद्दल बोलतंय ते !..................
कोण ? काय ? कसलं ? कार्यक्रम कधी आहे ?...... माझीच उलटी प्रश्नांची सरबत्ती !...................
कोण सी एल च ना ??... हो हो मीच .... आपण ?.................
मी भरद्वाज रहाळकर, आहो मागे बोलणं नाही का झालं आपलं... पत्रिका छापून आल्यात आणि वाटायलाही सुरुवात झालीय.... परवा कार्यक्रम आहे !!.... ............
हां हां.... आलोच मी ... आहो तुम्ही मॅटर दिलंच नाही... असो... आलोच मी दहा मिनिटांत... सातपूरहून तिथे पोहोचायला जेवढा वेळ लागेल तेवढाच...............
मला सांगितल्याचं; कांहितरी बोलणं झाल्याचं आठवत होतं पण तपशील एकदम ब्लँक होता. स्कूटरला किक मारली आणि पोहोचलो वाचनालयात... बघू पत्रिका... ठीक आहे... हे तपस्वी कोण ? म्हणजे डिझाईनमधे काय काय अपेक्षित आहे... साधारण साईज.. बजेट............
आहो ,"हे वाचनालय आयोजित करतंय, तपस्वी म्हणजे रोखठोक निर्भीड अभ्यासू विद्वान मान्यवर प्रतिष्ठित निरपेक्ष पत्रकार आहेत ज्यांचा दिल्लीतही राजकीय वर्तुळात आतिशय दबदबा आहे. उत्तम लेखक; स्पष्टवक्ते. देवदत्त स्वच्छ शुद्ध स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाजाच्या देणगीमुळे अनेक वर्ष आकाशवाणीवर बातम्या देत असत. त्यांचा अमृतमहोत्सवी नागरी सत्कार आहे. बाकी पत्रिकेत आहेच". कांही अजून हवं असेल तर विचारा...... बजेटला लिमिट तशी कांही नाही. सात ते दहा हजारांपर्यंत करा. अजूनाही थोडं इकडे तिकडे झालं तरी चालेल.
तिथेच त्याच पत्रिकेच्या मागच्या कोर्‍या पाठीवर सुचलं तसं स्केच काढून दाखवलं..........
डिझाईन तुमच्या मनानी करा; तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे पण "एक्स्लुझिव्ह" झालं पाहिजे. परवा संध्याकाळी सात वाजता कार्यक्रम सुरु होईल. दुपारी बाराएक वाजेपर्यंत दिलं तरी चालेल........
तपस्वींविषयीच्या स्वतःच्या अज्ञानाची कीव करत तातडीनं बाहेर पडलो आणि कामाला लागलो. तिथे वाचनालयात काढलेलं स्केच म्हणजे कांहीतरी काम केलंय हे दखवण्याचा, सातपूर ते नाशिक ह्या दहा मिनिटांत सामान्य ज्ञानाच्या अभावाने केलेला एक दुबळा प्रयत्न होता. अशा हलक्या फुलक्या वरवरच्या कल्पनेवर कुठलीच सूचना न करता माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून रहाळकर निश्चिंत झाले. मात्र त्याने माझी जबाबदारी आणिकच वाढवली आणि ओघाने झोपही उडवली.
हा दिवस तर गेलाच गेला पण दुसरा दिवसही असाच विचार करण्यात गेला. ती रात्र अस्वस्थ मंथनात कशी गेली आणि झोप केंव्हा लागली तेच कळलं नाही. सकाळ मात्र अतिशय अनाकलनीय स्वर्गीय संमोहित उत्साहात उगवली आणि मी तडक फॅक्टरीत चालता झालो.
माझा कुशल कारागीर; त्याला एक मदतनीस देऊन; आलेला कुठलाही फोन मला न देण्याचं सांगून मी बाजूला खुर्ची मांडून बसलो. सुचेल ते सांगायचं, माप काढून द्यायचं, मनासारखं नाही झालं की मोडून टाकायचं. मुंगीच्या पावलाने पण साकल्याने सृजन साकरत होतं.
बारा वाजून गेले आणि फोन येणं सुरू झालं. आमचे वजीर मला फोन न देण्याचे आणि समयसूचकतेने कारणे आणि प्रगती सांगण्याचे "संजयाचे " काम अत्यंत तत्परतेने करीत, अधिर झालेल्यांना दिलासा देत होते.
अमूर्त; आकार घेत होतं. माझ्यासहित कुणालाच पुढे काय कारायचं हे माहित नसूनही एकएक गोष्ट सुचत होती. घड्याळाच्या काट्याबरोबर आमची उत्सुकता आणि कार्यक्रमाच्या संयोजकांची अगतिकता वाढत होती.
पाच वाजून गेले होते. कल्पना आणि त्या अमलात आणण्याचा वेग वाढला होता. वेळेचं महत्व होतं. वाचनालयाचा आणि तपस्वींचा कार्यक्रम असल्याने तो वेळेत सुरु होणार ह्याची सर्वांनाच खात्री होती. शेवटचा एकेक क्षण सोनं घडवत पुढे सरकत होता. साडेसहा वाजता आलेल्या फोनला दिलेलं, " साहेब इथून जाऊन वीस मिनिटे झालीत. ते तिथे बाहेर पोहोचले असतील किंवा ट्रॅफिकमधे सिग्नलला अडकले असतील तर पोहचतीलच" हे उत्तर ऐकायला मी अजून सातपूरला कारखन्यातच होतो....!!
कार्यक्रम ठरल्याप्रमाणे वेळेवर बरोब्बर सात वाजता सुरु झाला होता त्यावेळी मी थिएटरच्या मागच्या बाजूला पोहोचलो. वाट पहणार्‍यांचा जीव भांड्यात पडला. स्वयंसेवकांनी धावत येऊन स्मृतीचिन्ह गाडीतून बाहेर काढलं. मी एका बाजूला उभा राहून; नेहमीप्रमाणे; ते बघणार्‍यांचे चेहरे न्याहाळत होतो. माणसाची उत्फूर्त आणि खरी प्रतिक्रिया फक्त याच क्षणाला दिसू शकते हे मला माझ्या अनुभवांनी आतापर्यंत शिकवलं होतं. (नंतर किंवा विचारल्यावर मिळालेलं उत्तर अथवा केलेलं कौतुक बर्‍याचदा कुणाला न दुखवण्याच्या भावनेतून मुत्सद्देगिरीने दिलेलं असतं.) इतरांसारखाच सहाळकरांचा उजळलेला चेहरा आणि त्या पाठोपाठ त्यांची मला शोधणारी नजर पाहिल्यावर मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. खुणेनीच "टॉप" म्हणून; कार्यक्रमानंतर जेवायला थांबायचं आमंत्रण दिलं. वेळेत; वेळ साजरी झाली होती.
*****************
विद्वान व्यक्तीसाठी आखलेला वैचारिक सोहळा आणि जेवण दोन्हीही उत्तम होतं. स्मृतिचिन्हाविषयीच्या, रंगमंचानी आणि प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकात मी न्हाऊन निघालो होतो. अनेक मोठमोठ्या मंडळींच्या अभिनंदनात तपस्वी अक्षरशः बुडाले होते. भाषणातल्या त्यांच्या पहिल्याच, " मी मोरेश्वर तपस्वी आपल्याला बातम्या देत आहे" ह्या वाक्याने त्यांची मला खरी आणि सर्वात जुनी ओळख पटवून दिली होती. आम्ही त्यावेळी कल्याणला रहात असू आणि मी जुनिअर के.जी. मधे होतो. सकाळच्या रेडिओवर बातम्या देणारी दोन नावं मी रोज ऐकून त्यांची नक्कल करीत असे. एक " मोरेश्वर तपस्वी आणि दुसरे माझ्या नावाशी साधर्म्य असलेले दत्ता कु़ळकर्णी "!! ते म्हणजेच हे मो. ग. तपस्वी हे मला आत्ता कळलं होतं. !!
आज मोरेश्वर तपस्वी मला माझ्या बाळपणात घेऊन गेले होते आणि मी त्यावेळच्या कुतुहल असलेल्या पडद्याआडच्या, मनात कोरल्या गेलेल्या आवजाच्या व्यक्तीला, तिच्या उदात्त व्यक्तिमत्वाला इतक्या जवळून संभ्रमित अवस्थेत अनोळखीपणाने पहात होतो.
रहाळकरांनी त्यांच्याशी माझी औपचारिक ओळख करून दिली. मी त्यांना वाकून चरणस्पर्श केला. त्यांनी प्रतिक्षिप्तपणे माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. अशी ओळख म्हणजे; लग्नात करून दिलेल्या ओळखीसारखी; लक्षात न रहाणारी असते; हे माहित असूनही मी भारावून गेलेल्या कांहीशा बधिर अवस्थेतच घरी आलो.
आठवड्याभरात, नि:संकोच मनमोकळेपणाने अत्यंत सन्मानाने माझं संपूर्ण पेमेंट काढण्यात आलं. तपस्वींनी; स्मृतीचिन्हाचं तोंडभारून कौतुक केल्याचं आयोजकांनी मला सांगितलं. मी कृतार्थ ऐकून घेतलं.
******************
एक दिवशी एका ओळखीच्या गृहस्थांनी; जे त्या सत्कार समारंभाला होते; मला रस्त्यात थांबवून; तपस्वींनी माझी आठवण काढल्याचं आणि त्यांना मला भेटायचं असल्याबद्दल सांगितलं. मी ठीकय म्हटलं आणि बोलण्यासाठी एक कांहितरी निमित्त म्हणून हा विषय काढला असावा असं समजून सोडून दिलं. परत एकदा वाचनालयाकडून असाच फोन आला, मी हो म्हटलं आणि कामाच्या रगाड्यात विसरून गेलो. तिसर्‍यांदा कुठल्याशा समारंभात; तपस्वींच्या आणि माझ्या एका निकटवर्तियाकडून जेंव्हा मला तेच सांगण्यात आलं तेंव्हा मात्र हे प्रकरण किती उत्कट आहे हे लक्षात घेऊन लगेच त्यांची भेट घ्ययचं ठरवलं आणि त्यांना फोन केला.
ओ हो हो नमस्कार... आहो किती वाट पहायला लावायची ... किती निरोप द्यायचे.... आज योग आला आहे पहा..केंव्हा येताय ??..... मला तुम्ही केलेलं स्मृतीचिन्ह फार आवडलं आहे आणि त्या संदर्भात तुमच्याशी अतिशय महत्वाचं बोलायचं आहे. .... इतके दिवस दुर्लक्षिलेल्या आमंत्रणाची आस्था बघून, काही कारण नसतांना आपण फार गुर्मीत वगैरे होतो अशी कुणाचीतरी गैरसमजूत झाल्याच्या अपराधी भावनेतून त्याच दिवशी त्यांना भेटायला जायचं ठरवलं आणि गेलो देखिल.
*******************
सायंकाळचे ठीक पाच. ठरलेल्या वेळात राईट टाईम सरांच्या घराची बेल वाजवली. मी आणि माझी बायको; आम्हा दोघांना दारात बघून सरांनी प्रसन्न चित्ताने हसून आमचं स्वागत केलं. त्यांचं संपूर्ण कुटुंबच आमची आतुरतेने वाट पहात असल्याचं एकंदर वातावरणात जाणवत होतं. मला लाजल्याहून लाजल्यासारखं झालं होत. आम्ही वाकुन नमस्कार केला. त्यांना अपेक्षित जागेवर बसलो. (तिथून आम्ही सर्वांना दिसू अशी व्यवस्था असावी, जशी मुलगी अथवा मुलगा बघण्यासाठी केली जाते).
चहा पाणी झाल्यावर, त्यांनी स्मृतीचिन्हाची मनापासून तारीफ केली, खूप आवडल्याचं सांगून म्हणाले की हे सर्व असलं तरी माझ्यातला पत्रकार अत्यंत अस्वस्थ आहे आणि तो मला तुम्हाला भेटल्याशिवाय चैन पडू देई ना. मला तुम्हाला यावर एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू ? मी आनंदानं म्हटलं जरूर विचारा. हे मी माझं परम भाग्य समजतो की आपल्यासारख्या महान व्यक्तिमत्वासमोर मी बसलो आहे, तुम्हाला माझी कलाकृती आवडली आहे आणि त्याविषयी कांही विचारावसं वाटतंय. कलाकाराला याहून अधिक काय हवं असतं सर......
सरांनी थेट प्रश्न विचारला, " ही सुंदर वस्तू बाय फ्लुक तशी झालीय की त्यामागे तुम्ही कांही विचार मांडलाय ??"....
अर्थातच सर, हे सर्व विशिष्ठ विचारांतीच बनवलं आहे...... मी...........
वाह .... फारच छान .... मला तेच ऐकायचं आहे.... मला हे बघून जे वाटलं तेच तुम्हाला म्हणायचं आहे का ते पडताळून पहायचं आहे......
मी सांगू लागलो........
सर ही "चौरंगावर" मांडलेली "सत्यनारायणाची" पूजा आहे. मागची भिंत गाईच्या शेणाने सारवलेली आहे. तीवर महिरप आहे, ती पांढरा रंग आणि गेरूचा वापर करून चितारली आहे. चौरंगावर एक ग्रंथ ठेवला आहे ती आपली आजवरची तपःश्चर्या आहे. हा ग्रंथ उघडा आहे आणि त्यात बुक मार्क आहे. झालेला भाग ७५ % आणि उरलेला २५% आसा आहे कारण हा "अमृत महोत्सव" आहे आणि "शतक" अपेक्षित आहे. बुक मार्क चांदीचा आणि त्यावर मोर आहे जे "सरस्वतीचं वाहन" आहे. ग्रंथाखाली चौरंगावर मध्यभागी "ज्ञानकमळाची (त्याला ब्रह्मकमळ वा गायत्री यंत्रही म्हणतात)" रांगोळी आहे जी आपलं सर्व कर्तृत्व हे "ज्ञानाधिष्ठित" असल्याचं सुचंवतं. ग्रंथाजवळ भिंतीशी एक "दीपस्तंभ" उभा आहे ज्यावर मार्गदर्शक चांदीचा "लामणदिवा (नंदादीप)" आहे. स्तंभाच्या पायथ्याशी आपली कारकीर्द लिहिणारी "सोन्याची दौत त्यात चांदीच्या पिसाची मृदु लेखणी" आहे. मागे सारवलेल्या भिंतीवर डाव्या कोपर्‍यात "सूर्य", उजव्या कोपर्‍यात "चंद्र" आहे. आपल्या लिखाणाची ऊर्जा सूर्याकडून चंद्राकडे- चंद्राकडून लामणदिव्याकडे-दिव्याकडून दौत आणि लेखणीला मिळाली आहे जी "यावच्चंद्रदिवाकरो" अशीच आहे. भिंतीवर चार ओळी उधृत केल्या आहेत जी आपली वचने आहेत.
"श्रीगणेशायनमः,
श्रीगुरुभ्योनमः,
श्रीसरस्वत्यैनमः,
श्रीपत्रकारितेनमः."
मी माझ्या तंद्रीत अस्खलित एकेका मांडणीचे संकेत सांगता सांगता सरांचा प्रफुल्लित होत चाललेला चेहरा वाचत होतो.
माझं सर्व सांगून झाल्यावर अतिशय आनंदाने आणि अभिमानाने विजयी अविर्भावात एकवार त्यांच्या कुटुंबाकडे आणि माझ्याकडे कौतुकाने पहात सर म्हणाले, वाह .... फारच छान..... अगदी माझ्या मनातलं वचल्यासारखं बोललात..... तिथे कार्यक्रमाच्या गर्दीत मला नीटसं बघता आलं नाही. घरी आल्यावर मी त्याचं मनापासून निरिक्षण केलं आणि माझ्या मनात उमटलेले तरंग कागदावर उतरवून काढले. ते आणि तुमची संकल्पना पडताळून पहाण्यासाठीची तळमळ आता शांत झाली.
सरांनी, रचलेले वर्णन माझ्या समोर ठेवले, ते शब्द असे :-
चार वेदांचा चौरंग
वरी ब्रह्मकमळ रेखिले
ज्ञानाचे हे अधिष्ठान
जणु वेदांग जाहले
ज्ञानकमळा शोभती
दळे चोवीस रेखीव
चोवीस नामांनी जणु
पूजितात विष्णुदेव
सर्व साज रेखाटला
जणु आळल्या रेखांनी
वनवासी कुटीमाजी
कला साकारे नमनांनी
उभी शारदा अमूर्त
मूर्त सर्व करणांनी
काजळाच्या लख्ख पात्री
मृदु पिसाची लेखणी
मृदु लेखणी निर्मिते
ग्रंथ सधन कठिण
दीपस्तंभी नंदादीप
स्फूर्तिदाता नारायण
मानपत्र सांगे 'जर
अधिष्ठान, कर्ता,करण
ठाम, विराम ना यत्ना तर
दैव होतेच प्रसन्न'
म्हणे 'पत्र महर्षी ' झाला
कसली ना धरिता आस
नित्य साधना चालावी
' पांडित्याचा ' नको सोस
या स्मृतीचिन्हातून
मिळो अक्षय प्रेरणा
होवो शारदा सुप्रसन्न
रेखोनी विक्रम-चिन्हा
...............मो. ग. तपस्वी
१२ डिसेंबर १९९८
***************
tapasvi trophy.jpg
असं हे "स्मृतीचिन्ह" पुरस्कर्त्याच्या प्रभावाच्या पुण्ण्याईने उमललेलं.
दोघांच्याही स्मृतीत राहिलेलं.
व्यावहारिक अर्थापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान.
व्यापारी कल्पनांना छेदून विशेष आत्मिक समाधान देणारं.
प्रामाणिक तपस्या स्वतःहून फलद्रुप करणारं.
जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर ठसा उमटवणारं.
माझ्या कलाकृतीची आठवण माझ्या पश्चातही चिरंजीव जपणारं.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या पुढच्या प्रवासाला प्रेरणा, स्फूर्ति, बळ आणि आत्मविश्वास देणारं.
***************

No comments:

Post a Comment