Thursday, 24 May 2012

त्या

तो तीन वर्षांचा असेल. चुणचुणीत, गुटगुटीत, खोडकर. कल्याणला रहायचा स्वामीनारायण बिल्डिंगमधे; अहिल्यादेवी चौकात; तिसर्‍या मजल्यावर; कीर्तनेंच्या शेजारी. सुसंस्कृत-सुशिक्षित-रूपवान-मेड फॉर इच अदर दांपत्याचा पहिला मुलगा.
रमायण, महाभारत, इसापनीतीच्या सुरम्य सुरस बोधकथा घरी होतच असंत पण प्राथमिक शिक्षण संस्कारांसाठी त्याला बालवाडीत घतला होता.
माड-नारळ झावळ्यांच्या कोंदणात वसलेली शाळेची टुमदार कौलारू वास्तू घराच्या गॅलरीतून दिसत असे. शळेची घंटा, प्रर्थना ऐकू येण्याइतपत अंतर असलं तरी जाण्यायेण्याचा रस्ता रहदारीचा असल्यामुळे त्याला नेण्याआणण्यासाठी मुलगी ठेवली होती. गोरी; सडपातळ; लांब केसांची. हसली की खळ्या उमलायच्या दोन्ही गालांवर. तिच्या बरोबर शाळेत जायला स्वारी खुष असायची. तिचा हात धरून चालत चालत त्याचे ते दिवस अत्यंत आनंदात चालले होते.
एक दिवस ती अचानक दुपारी घरी आली. तो अत्यानंदाने तिला जाऊन बिलगला. तिचं घरी येणं खूपच अनपेक्षित होतं. रोज आई त्याला खाली रस्त्यापर्यंत सोडायला आणि घ्यायला जात असे. त्याला गॅलरीत खेळायला सांगून, त्याची आई आणि ती, बराच वेळ बोलत होत्या. नंतर आईने तिचे चहापाणी करून तिला पैसे दिले आणि ती निघाली. तो कितीतरी वेळ; ती दिसेनाशी होईपर्यंत आईच्या पायांना लपेटून; तिच्यावरची नजर हटू न देता; हर्षोल्हासाने तिला अच्छा करत होता. ती पण मागे वळून बघत नजरेआड झाली होती. त्या वेळी तिच्या पापणीच्या कडांवर पाणी चमकल्याचा भास त्याला झाला होता.
त्यानंतर आठवडा पंधरा दिवस त्याची आईच त्याला शाळेत सोडायला गेली. तो रोज; तिची आठवण काढत आणि उद्या येईल या आशेवर स्वतःची समजूत घालत असे.
एका सकाळी आई खालपर्यंतच आली आणि त्याला नव्या मुलीच्या ताब्यात दिले.
आईची चिंता मिटली होती...............
......... आज आई का शळेत आली म्हणून त्याला आश्चर्य वाटलं होतं. ती बराच वेळ मुख्य बाईंच्या ऑफीसमधे बोलत होती. तिथे त्याला शाळेत ने आण करणारी नवी मुलगी पण होती. बाई तिला रागवत होत्या आणि ती; डोळ्यात पाणी आणून; तिची चूक नसल्याबद्दल कांही तरी सांगत असल्याचं तो दुरून बघत होता. आई पण रागावल्यासारखी वाटत होती. तो आज आईबरोबरच घरी आला.
येतांना त्यानं आईला तिच्या रडण्याबद्दल विचारलं. रस्त्यानं चालतांना तिचं त्याच्याकडे लक्ष नसतं, ती एका बाजूला तर तो दुसर्‍या बाजूला असं बाईंनी पाहिलं होतं आणि ते सांगायसाठीच त्यंनी तिला आणि आईला शळेत बोलावलं होतं. तिच्या ह्या बेजबाबदारपणाबद्दल कामावरून काढून टाकल्यामुळे ती रडत होती.
त्याही वयात त्याला खूप अपराधी वाटलं आणि त्याने आईला सांगून टाकलं की त्यात तिची कांहीच चूक नाही, तिनी हात धरू नये म्हणून तोच तिच्यापासून दूर पळत होता.
आता तर परिस्थिती अजूनच वाईट झाली होती. त्याच्या अशा वागण्याचं मूळ शोधण्यासाठी त्याचीच उलट तपसणी सुरू झाली. आपल्यामुळेच त्या गरीब मुलीवर अन्याय झाला या भावनेने आई अस्वस्थ झालेली आणि हा कांही केल्या कारण सांगायला तयार नाही. याचं पर्यावसान इतकं विकोपाला गेलं की आईचा तोलच सुटला आणि तिने त्याला खिडकीच्या गजाला उलटं टांगून वेताने फोड फोड फोडला.
त्याचीच खरी कमाल; हूं नाही की चूं नाही. जेवणही नाही. आई पण जेवली नाही. हा रडून आणि आई थकून तशीच झोपी गेली. तिन्हीसांजेला आई दचकूनच उठली. तो तसाच खिडकीला टांगलेल्या अवस्थेत झोपलेला होता. ते पाहून आईचं काळीज हेलावलं. एव्हाना ती शांत झाली होती आणि संतापची जागा हळवेपणानं घेतली होती.
कोवळ्या जिवाला इतकं निर्दयीपणानं मारल्याबद्दल ती कळवळली पण होती आणि कारण न कळल्याने व्यथितही होती. तिच्या विकल व्हृदयातले मायेचे बांध फुटले होते. त्याच्या अंगावरचे हिरवे-निळे व्रण कुरवाळत अखंड पाझरत होती ती किती तरी वेळ. दोघंही एकमेकांकडे केविलवाणे बघत होते, तो " नको ना विचारूस " म्हणून आणि आई, " सांग ना रे; नको अंत पाहूस" म्हणून.
आईचा विव्हळ त्याला कळत होता पण----
" गरजेपोटी भांडी घासून ओशट झालेल्या तिच्या खरखरीत हातांच्या नकोशा स्पर्शाबद्दल आणि तिचा कांहीही दोष नसलेल्या पण तिला जन्मजात मिळालेल्या काळ्या कुरूप दिसण्याबद्दल " त्याला कधीच कुणाजवळ बोलायचं नव्हतं.
त्या दोघींच्याही स्मृती, आजही त्याने तशाच जपून ठेवल्या आहेत.
.........................................................अज्ञात

No comments:

Post a Comment