Tuesday, 29 May 2012

दूर-आशा

पापण्यांचे सोस माझ्या पंजरी बिलगून हे
अंतरी ओल्या खळ्याचे श्वास अजुनी नागवे
अंकुरे खडकातही; ध्यासातले आलेख हे
खोल रुतलेले; कळे ना कोण संधी जागवे

ओतणे निर्व्याज पाणी आणि अगणित जोगवे
थेंब थेंबाचा उसासा शार माती जोजवे
गुदमराला एक रेषेचे उताविळ घर नवे
दूर-आशा गात येई कोंब घेउनिया सवे

.................................अज्ञात

Thursday, 24 May 2012

पाणउतारा

खार्‍या निरुपयोगी अथांग समुद्रातला थेंब !,
आदित्याच्या ऊग्र तेजात तावून सुलाखून शुध्दोदकाचा प्राण होऊन वरुण दरबारी रुजू होतो. मध्यतळातून काठापर्यंत; आकाशाला वेधत उसळणारा अस्वस्थ जीव, हुरळून जातो मेघात. सीमाच नसते त्याच्या फिरण्याला आता. ऊन सावल्यांच्या खेळात निरनिराळी रुपं धारण करू शकत असतो तो, स्वैरपणे, खोल निळ्या आकाशात. पंखांबरोबर सात रंगही मिळालेले असतात त्याला उधळ्ण्यासाठी, वरदानात. अंत नसतो दिशांना. वार्‍याच्या खांद्यावरून वहातांना, आधाराशिवाय तरंगतांना, किनार्‍याशिवाय पिंजतांना, प्रयत्नांशिवाय उसळतांना, त्याला विसरायला होतं स्वतःलाही.
एके दिवशी वाराच थांबतो वहायचा आणि प्राण कोसळू लागतो खाली - पृथ्वीकडे; पुन्हा अनिर्बंध वेगाने. धडपडीत आदळतो-दळतो-गडगडतो-जळतो-कडकडतो, चमकून बघतो तो काय !!.., एका प्रचंड पर्वताने रस्ताच आडवलेला असतो पुढे जाण्याचा. त्याच्या भरकट्ण्याला लगाम घातलेला असतो पूर्णपणे.
आज त्याला प्रथमच जाणीव होते त्याच्या निर्जीव्-निष्प्रभ अस्तित्वाची. गरजेपोटी गरज निर्माण होते सावरणार्‍या आधाराची; अडचण झेलण्यार्‍या मातृत्वाची, निश्चित आणि योग्य दिशा दाखवणार्‍या दातृत्वाची. तो डोळे गच्च मिटून घेतो आणि धावा करतो माहेरचा; पुन्हा कुशीत घेण्यासाठी.
पाऊल टेकताच जमिनीला झालेला आनंद, स्पर्शात उमललेला शहारा तो अनुभवत असतो. असमंतात दाट भरलेला सुगंध, त्याच्याशी इतरांच्या असलेल्या रुणानुबंधांची आठवण करून देत असतो. अशातही तो वहात सुटतो; वाट फुटेल तिथे आणि त्याला आधार मिळतो काठांचा, माहेरचा रस्ता दाखविणार्‍या दुथडीचा,- न मागता.
त्याच्या आणि इतर प्रवाहांच्या विसंगतीतील सुसंगती त्याला उमजलेली असते एव्हाना. म्हणून, सर्वच सोबत्यांना बरोबर घेऊन जाण्याचा अट्टाहास; किंवा ते आपल्या बरोबरीने चालू शकत नसल्याबद्दलचा उपहास, त्याच्या हातून कधीच गळून पड्लेला असतो खोल डोहात.
पंचमहाभुतांच्या प्रचंड ताकदीपुढे; मोहात भरकट्लेल्या आयुष्याला; निस्वार्थ सावरणार्‍या दोन्हीही तीरांच्या मैत्रीची तीव्रता किती अधिक आहे याची प्रचिती वेडावत असते त्याला कृतज्ञतेने.
काठांमुळे तो आणि त्याच्यामुळे काठ म्हणूनच समृध्द होऊ शकतात / होऊ शकलेत युगे युगे.
"प्रवाह असो वा काठ, एकमेकांना पूरक; असे विश्वास हवेत श्वासांना,"ही जाणीव असणे महत्वाचे.
परमेश्वराजवळ सर्वांची हीच प्रर्थना कायम असो की, "जीवनाच्या,-उसळलेल्या,-घुसळलेल्या,-भोवरलेल्या प्रवाही वेदना पेलण्यासाठी; प्रत्येकाला सदाही सुफळ, समृध्द आणि सतर्क काठ मिळोत जन्मो जन्मी."
हव्यास जडो सहवासाचा
अश्वासक झुरत्या काठांचा
रंध्रांस मिळो आसीम गारवा
श्वास अमृताचा
रे जगणे शिवाय पात्र किनारे
व्याकुळ क्षेम विसावा
जुळे तराणे खुळे जरी
साकळ हा प्रेम असावा
....................अज्ञात

त्या

तो तीन वर्षांचा असेल. चुणचुणीत, गुटगुटीत, खोडकर. कल्याणला रहायचा स्वामीनारायण बिल्डिंगमधे; अहिल्यादेवी चौकात; तिसर्‍या मजल्यावर; कीर्तनेंच्या शेजारी. सुसंस्कृत-सुशिक्षित-रूपवान-मेड फॉर इच अदर दांपत्याचा पहिला मुलगा.
रमायण, महाभारत, इसापनीतीच्या सुरम्य सुरस बोधकथा घरी होतच असंत पण प्राथमिक शिक्षण संस्कारांसाठी त्याला बालवाडीत घतला होता.
माड-नारळ झावळ्यांच्या कोंदणात वसलेली शाळेची टुमदार कौलारू वास्तू घराच्या गॅलरीतून दिसत असे. शळेची घंटा, प्रर्थना ऐकू येण्याइतपत अंतर असलं तरी जाण्यायेण्याचा रस्ता रहदारीचा असल्यामुळे त्याला नेण्याआणण्यासाठी मुलगी ठेवली होती. गोरी; सडपातळ; लांब केसांची. हसली की खळ्या उमलायच्या दोन्ही गालांवर. तिच्या बरोबर शाळेत जायला स्वारी खुष असायची. तिचा हात धरून चालत चालत त्याचे ते दिवस अत्यंत आनंदात चालले होते.
एक दिवस ती अचानक दुपारी घरी आली. तो अत्यानंदाने तिला जाऊन बिलगला. तिचं घरी येणं खूपच अनपेक्षित होतं. रोज आई त्याला खाली रस्त्यापर्यंत सोडायला आणि घ्यायला जात असे. त्याला गॅलरीत खेळायला सांगून, त्याची आई आणि ती, बराच वेळ बोलत होत्या. नंतर आईने तिचे चहापाणी करून तिला पैसे दिले आणि ती निघाली. तो कितीतरी वेळ; ती दिसेनाशी होईपर्यंत आईच्या पायांना लपेटून; तिच्यावरची नजर हटू न देता; हर्षोल्हासाने तिला अच्छा करत होता. ती पण मागे वळून बघत नजरेआड झाली होती. त्या वेळी तिच्या पापणीच्या कडांवर पाणी चमकल्याचा भास त्याला झाला होता.
त्यानंतर आठवडा पंधरा दिवस त्याची आईच त्याला शाळेत सोडायला गेली. तो रोज; तिची आठवण काढत आणि उद्या येईल या आशेवर स्वतःची समजूत घालत असे.
एका सकाळी आई खालपर्यंतच आली आणि त्याला नव्या मुलीच्या ताब्यात दिले.
आईची चिंता मिटली होती...............
......... आज आई का शळेत आली म्हणून त्याला आश्चर्य वाटलं होतं. ती बराच वेळ मुख्य बाईंच्या ऑफीसमधे बोलत होती. तिथे त्याला शाळेत ने आण करणारी नवी मुलगी पण होती. बाई तिला रागवत होत्या आणि ती; डोळ्यात पाणी आणून; तिची चूक नसल्याबद्दल कांही तरी सांगत असल्याचं तो दुरून बघत होता. आई पण रागावल्यासारखी वाटत होती. तो आज आईबरोबरच घरी आला.
येतांना त्यानं आईला तिच्या रडण्याबद्दल विचारलं. रस्त्यानं चालतांना तिचं त्याच्याकडे लक्ष नसतं, ती एका बाजूला तर तो दुसर्‍या बाजूला असं बाईंनी पाहिलं होतं आणि ते सांगायसाठीच त्यंनी तिला आणि आईला शळेत बोलावलं होतं. तिच्या ह्या बेजबाबदारपणाबद्दल कामावरून काढून टाकल्यामुळे ती रडत होती.
त्याही वयात त्याला खूप अपराधी वाटलं आणि त्याने आईला सांगून टाकलं की त्यात तिची कांहीच चूक नाही, तिनी हात धरू नये म्हणून तोच तिच्यापासून दूर पळत होता.
आता तर परिस्थिती अजूनच वाईट झाली होती. त्याच्या अशा वागण्याचं मूळ शोधण्यासाठी त्याचीच उलट तपसणी सुरू झाली. आपल्यामुळेच त्या गरीब मुलीवर अन्याय झाला या भावनेने आई अस्वस्थ झालेली आणि हा कांही केल्या कारण सांगायला तयार नाही. याचं पर्यावसान इतकं विकोपाला गेलं की आईचा तोलच सुटला आणि तिने त्याला खिडकीच्या गजाला उलटं टांगून वेताने फोड फोड फोडला.
त्याचीच खरी कमाल; हूं नाही की चूं नाही. जेवणही नाही. आई पण जेवली नाही. हा रडून आणि आई थकून तशीच झोपी गेली. तिन्हीसांजेला आई दचकूनच उठली. तो तसाच खिडकीला टांगलेल्या अवस्थेत झोपलेला होता. ते पाहून आईचं काळीज हेलावलं. एव्हाना ती शांत झाली होती आणि संतापची जागा हळवेपणानं घेतली होती.
कोवळ्या जिवाला इतकं निर्दयीपणानं मारल्याबद्दल ती कळवळली पण होती आणि कारण न कळल्याने व्यथितही होती. तिच्या विकल व्हृदयातले मायेचे बांध फुटले होते. त्याच्या अंगावरचे हिरवे-निळे व्रण कुरवाळत अखंड पाझरत होती ती किती तरी वेळ. दोघंही एकमेकांकडे केविलवाणे बघत होते, तो " नको ना विचारूस " म्हणून आणि आई, " सांग ना रे; नको अंत पाहूस" म्हणून.
आईचा विव्हळ त्याला कळत होता पण----
" गरजेपोटी भांडी घासून ओशट झालेल्या तिच्या खरखरीत हातांच्या नकोशा स्पर्शाबद्दल आणि तिचा कांहीही दोष नसलेल्या पण तिला जन्मजात मिळालेल्या काळ्या कुरूप दिसण्याबद्दल " त्याला कधीच कुणाजवळ बोलायचं नव्हतं.
त्या दोघींच्याही स्मृती, आजही त्याने तशाच जपून ठेवल्या आहेत.
.........................................................अज्ञात

प्रेझेंट

त्या दोघी नादावल्या होत्या आई-बाबांच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला कांहीतरी वेगळं धमाल करायचं म्हणून. मोठी नुकतीच एम्.सी.एस. झाली होती आणि धाकटी आर्किटेक्चरला चौथ्या वर्षाला होती. आई कलाकार / चित्रकार; चित्रकलेचे वर्ग चालवीत असे. बाबा मुंबईला मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करीत. ते कायम फिरतीवर असत. पूर्वी शनिवार-रविवार दोन दिवस सुटी असे पण आता एकच दिवस असल्याने फक्त रविवारी ती चौघं घरी एकत्र भेटू शकत. घरात मुलींचे देवतुल्य आजोबापण होते. ह्या चौकोनी सुखी सुसंस्कारित कुटुंबाचे दोन कोपरे मुलींचे होते. मुलीच त्यांची मुलं होत्या.
आई-बाबांचा; म्हटलं तर प्रेमविवाह होता किंवा नव्हताही. एका कलाक्षेत्रात काम करणार्‍या संस्कृतिक संस्थेत दोघांची चांगली ओळख होती आणि त्यांना विवाहबंधनात अडकवलं त्यांच्या मित्रांनी.
अत्यंत साध्या, सर्वसाधारण परिस्थितीच्या कुटुंबांच्या संगमापासून; आज उच्च मध्यमवर्गीय टप्प्यापर्यंतच्या वाटचालीचा आलेख मांडावा असा घाट दोघी मुलींनी घातला होता त्यांना सुगावा लागू न देता.
त्या दोघांचं लग्न लावून देण्यातला शिलेदार आणि आजपर्यंतच्या त्यांच्या संसाराच्या वाटचालीचा 'तो' एक जवळचा सक्षीदर होता. फोटोंचं प्रोजेक्ट; गोपनीयता जपून; प्रत्यक्ष उतरवणारा 'तो' त्यांचा उजवा हात होता. कल्पना, संकल्पना, कल्पना विस्तार, संकलन, स्कॅनिंग, डिझायनिंग, प्रिन्टिंग इ. सर्वच गोष्टींसाठी तो आणि त्याचं ऑफिस उत्साहानं भिडलं होतं.
इकडे ही तयारी चालू असली तरी घरात तशी कसरतच चालू होती. नूतनीकरणाच्या कामामुळे वरचा मजला पूर्ण रिकामा करून सर्व सामान खाली आणि शेजारच्या इमारतीतल्या एका रिकाम्या फ्लॅटमधे विभागून ठेवल्याने विस्कळीत झालेलं होतं. जवळच्या कुण्या नातेवाईकाकडे कसलसं मंगल कार्य असल्याने पहुण्या-राहुण्यांचा वर्दळ होता.
धकटीची वार्षिक परीक्षा; त्यात भरीस भर म्हणून आजोबांची तब्येत अचानक खराब झाली आणि त्यांना हॉस्पिटलमधे ठेवावं लागलं. संपूर्ण घर यांत्रिक धावपळीमधे अडकून गेलं होतं.
मोठी वेळात वेळ काढून त्याच्याकडे चालू असलेल्या कामाशी संपर्क ठेवून होती; पण मनात योजल्याप्रमाणे पुरेसा वेळ देणं दोघींनाही अशक्य झालं होतं. याही परिस्थितीत त्यांनी; सर्व नातेवाईक आणि आई-बाबांच्या मित्र -मैत्रिणींना, आई-बाबांविषयी अनुभव आणि आठवणी लिहून पठविण्यासाठी संपर्क केला होता. फोटोंबरोबर एक हस्तलिखित खजिनाच सादर करायचा होता त्यांना. सर्वांच्या मनातले आई-बाबा उलगडून बघायचे आणि दाखवायचे होते त्यांना आणि इतरांना.
आजोबांच्या आजारपणाच्या सावटाखाली साधेपणाने "सिल्वर ज्युबिली" साजरी झाली. "सरप्राईज" हे खरोखरंच अनपेक्षितपणे; सद्य परिस्थितीत; उत्सवमुर्तींवर, आठवणींचा, जिव्हाळ्याचा, मुलींच्या लाघवी प्रेमाचा शिडकावा करून गेलं. संपूर्ण वातावरण , त्या रात्रीत , सद्गदीत भारावलेल्या अवस्थेत स्वप्नागत गुडुप झालं. सर्वांनाच कृतकृत्य वाटलं. दोन टेबल कॅलेंडर्स, दोन वॉल कॅलेंडर्स, दोन अनुक्रमे तीन फूट व चार फुटाचे वॉलपिसेस, समारंभपूर्वक मुलींनी आपल्या आई-बाबांना दिले होते. त्यांच्या आयुष्याचा कोलाज त्यांच्या सुपूर्द केला होता.
कार्यक्रम झाल्यावर मुलींना मात्र उगाच रुख रुख लागून राहिली की त्यासाठी त्या पुरेसा वेळ देऊ शकल्या नाही आणि सर्व 'त्या' काकालाच करावं लागलं म्हणून. खरं तर काकाला त्याचं कांहीच वाटलं नव्हतं कारण तो त्यांना त्यांच्यापासून वेगळं मानतच नव्हता.
पाचच दिवसांनी मोठीचापण वाढदिवस होता. काकाने तिचाच डाव तिच्यासाठी वापरला. तिला आवडणारे झाडफुलांचे आणि तिला माहित नसलेला तिचा स्वतःचा एक छान फोटो, प्रत्येकाच्यामागे समर्पक काव्यपंक्ती लिहून एक संग्रह करून पाठवला. यातूनच तिला तिच्या आईबाबांच्या भावनांचा अंदाज आला होता. तसा तिचा फोन आला होता; या सर्वांपुढे नि:शब्द झाल्याबद्दलचा.
इकडे तो पूर्ण बुडाला होता भावनेच्या पुरामधे. एकटाच असल्याने अशी भारवलेली अवस्था कुणाशी वाटून पण घेऊ शकत नव्हता. एकटाच स्फुंदत होता सर्वांचे आश्चर्यमिश्रित कौतुकाने ओसंडत असलेले आनंदी चेहरे आठवून आठवून. त्याचा आनंद तोच होता. खूप श्रीमंत वाटत होतं त्याला आज. ऐश्वर्य उन्मळत होतं त्याच्या आनंदाश्रूंतून एकांतात. जीव गुदमरत होता भावनांच्या ओझ्याखाली. बांध फुटला होता. चांगुलपणाच्या सीमाच सहन होत नव्हत्या त्याच्या वहाण्याला. आवरणं अवघड झालं होतं. त्या दिवशी संध्याकाळी त्यानं नेहमीप्रमाणे वाढदिवसाचं; तिच्या घरी जाऊन अभिनंदन करणं, टाळलंच. बाहेरही कुठे रमण्यासाठी त्याचं लक्ष लागलं नाही. तो कधी नव्हे तो रात्री आठ वाजताच झोपी गेला गुंगलेल्या मनस्थितीत.
विसरला, आता येत नाही असं गृहित धरून अखेर रात्री अकरा वाजता गुड नाईट चा एस एम एस आला. बीप ने जाग आली. अस्वस्थपणाने मात केली. फोनवर फक्त गुड नाईट म्हणून त्याने आपली अवस्था लपवली. त्यात ती रागावली नसल्याची दोन वक्य त्याने ऐकली. जिवाची ऊल घाल करत पहाटे सडेतीनला सकाळ उगवली.
ती ऑफिसला जाण्याच्या आत त्याने तिला घरी जाऊन विश केलं आणि तिच्यासाठी अमेरिकेहून आणलेलं "रिस्ट वॉच"
प्रेझेंट दिलं. दोघीही खुष होत्या. दोघींनी त्याला आदराने नमस्कार केला आणि एक "प्रेझेंटची" पिशवी देऊ केली. त्याने झटकन हात मागे केला. त्याला; तो; 'त्याने आपलेपणाने केलेल्या कामचा मोबदला वाटला'. दोघींचे चेहरे बिचारे झाले. नाईलाजाने सर्वजण आपापल्या कामाला लागले.
चहा फराळ करून तो ऑफिसला आला खरा पण त्याला कांहीच सुचत नव्हतं. कामाचे अक्षांश रेखांश सापडत नव्हते. विस्कटलेल्या अवस्थेत आधार वाटत होता फक्त कागद पेनचा. ही अवस्था फक्त तोच समजू शकत होता त्याचं कुठलंही भांडवल होऊ न देता. मनाच कोंडमारा रिचवेपर्यंत दुपारचे चार वाजले होते. ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. दडपण सरलं होतं. कागद लेखणीने त्याचा त्यालाच गुरु बनवलं होतं. प्रेझेंट देण्या-घेण्यामागची आंतरभावना स्पष्ट करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडलं होतं. प्रत्यक्ष भगवंतापुढेही श्रेष्ठ ठरलेल्या सुदाम्याच्या पोह्यांची गोष्ट पुन्हा ताजी झाली होती.
फुलांचा सुगंध येत रहातो तो घेत रहायचं असतं. त्याच्या बदल्यात त्याची कुठलीही अपेक्षा नसते. तरीही त्याला खत-पाणी घतल्याने त्याची क्षमता वाढत असते. दोघांच्या या भावनेत व्यवहार कुठे आला ? इथंही कुणीच कुणाकडून काहीही अपेक्षा न करता एकमेकांना बरंच कांही दिलं होतं. मोबदल्याच्या भावनेला कुठेही थारा नव्हता. मग त्याच्या मनात असं का आलं ?
निसर्गातली सहजता हरवली होती त्याच्यातून काही काळापुरती. अस्तित्वाची-त्याच्या कर्तेपणाची जोखड डोळ्यांना इकडे तिकडे पाहू देत नव्हती. दृष्टीच्या अनेक कोनांपासून तिने त्याला वंचित केलं होतं.
हृदयात आधीच गुंफलेल्या धाग्यांना, अशा देण्या घेण्याने, इतरही संवेदनांची जाणीव मिळून त्याचा उत्सव होत असतो. हिरमुसलेल्या गाठी टवटवीत होत असतात.
अत्यंत प्रसन्न, तरल, हलक्या, नव्याने उगवलेल्या मनस्थितीत त्याने तिला "एस एम एस" केला,
" झाल्या गोष्टीबद्दल माफ कर. मी प्रेझेंट घेणार आहे. आजच. तुम्हा दोघींच्या सोयीची वेळ कळव. मी येईन. वाट पहात आहे."
त्याने प्रेझेंट घ्यायचं ठरवलं होतं.
त्याला हसु पहायचं होतं त्या दोघींच्या चेहेर्‍यावर उमललेलं.
आणि हाच तर कळस होता त्याने त्यांच्यासाठी केलेल्या कामावरचा.
त्याला दुसरं काय हवं होतं ?
साध्य आणि साधन यातला फरक शिकवला होता परिस्थितीने आज त्याला.
......................................................................अज्ञात

रंगभूमी दिन !!

५ नोव्हेंबर २००७ ह्या रंगभूमी दिनाच्या दिवशी; रंगमंच पूजनासाठी; अनपेक्षितपणे मला/आम्हा उभयतांना नाशिकच्या सार्वजनिक वचनालयाकडून निमंत्रण आलं आणि भाषण करण्याच्या निमित्तने जे विचारमंथन झालं त्याचा हा गोषवारा.
रंगभूमी दिन !!
जीवनाच्या रंगपटावरील सोंगट्यांना खेळवणार्‍या हातांना नमन करण्याचा दिवस. प्रत्येक रंगकर्मीची कृतज्ञता आज नटराज चरणी नतमस्तक होते. मंचावरची मस्ती विनम्र होण्याचा हा उत्सव !!!
मंच नाटकाचा असो वा आयुष्याचा, "प्रवास आणि अनुभव" सारखाच. किंबहुना "अनेक प्रवासांचा एकत्रित अनुभव" म्हणजे रंगमंच.
माणसाच्या जडण घडणीत मोलाचा सहभाग असलेला वाहक म्हणजे "नाटक". जगणार्‍या अगणित प्रकृतींची जिवंत अनुभूती देणारी आणि आत्मपरीक्षण समृद्ध करणारी एक संवेदनशील कला म्हणजे "नाटक". माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाचा अविभाज्य भाग म्हणजे "नाटक".
रंगभूमी माणसाला बरंच कांही शिकवते आणि परिपक्व करते हा माझा अनुभव आहे. अनुबंध आणि अनुकरणातून समज वृद्धिंगत होत असते. तिचं प्रभावी मध्यम म्हणजे "रंगभूमी".
सर्वांच्या वतीने नटराज पूजन सोहळ्याचा मान आम्हाला मिळणं हा क्षण आनंदाचाच. कारण ह्यासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तिरेखा याच रंगभूमीने घडवल्या आहेत.
वेगवेगळ्या नाट्याकृतींतून उभ्या केलेल्या विविध भूमिकांनी मला त्या त्या व्यक्तिरेखांची सखोल ओळख करून दिली आहे जेणेकरून "माणूस"; त्याचं "माणूसपण" ओळखणं मला शक्य झालं. लेखकाचा उपन्यास, दिग्दर्शकाचा अभ्यास आणि माझा ध्यास यातून प्रत्येकाची मानसिकता, विचारांची प्रगल्भता, शब्दांची आणि वाक्य रचनांची श्रीमंती मला मिळाली. कितीही मोठी भरारी मारली तरी पाय जमिनीवर ठेवण्याची वृत्ती मिळाली. चेहर्‍याला रंग असलेली भूमिका आणि मूळ अस्तित्व यातला फरक उमजला. कुठलीही भूमिका वठवतांना उच्चनीच भेद न मानता जीव ओतण्याची संथा मिळाली. हातात हात घालून एकाच ठिकणी लक्ष एकाग्र करून मेरू पादाक्रांत करण्याची दिशा मिळाली. सामुहिक वाटचालीत वैयक्तिक विचार अलिप्त ठेवण्याची दीक्षा मिळाली.
प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांना संमोहित करण्याची विद्या मिळाली. परकाया प्रवेशातून कुणाचंही मन स्वतःमधे सामावून घेण्याची क्षमता मिळाली.
उपलब्ध असलेली प्रत्येक वस्तू कशी केंव्हा कधी आणि किती वापरायची ह्याची शिस्त मिळाली. कलाक्षेत्रातल्या इतरही अंगांचं सौंदर्य पारखण्याची दृष्टी मिळाली.
समूहाबरोबर चालतांना त्यातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान करण्याचा मंत्र मिळाला. स्वतःला विसरून जगण्याचा स्वतंत्र मार्ग मिळाला.
*****
व्यक्ति तितक्या प्रकृती असतात पण प्रत्येकाचा प्रत्येक प्रकृतीशी संबंध येतोच असं नाही. शिवाय कांही व्यक्तिरेखा आणि प्रसंग हे सामान्य जीवनापेक्षा वेगळे असतात. अशांची आणि जे तुमच्या आमच्या आयुष्यात अनेकदा सहजपणे घडून जात असतं त्याची, प्रबोधनासाठी वा मनोरंजनासाठी, किंबहुना या दोन्हींसाठी केलेली एकत्रित-सुयोग्य-ठळक मांडणी म्हणजेही "नाटक".
नाटक हे प्रसाराचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याचा आपल्या संसारिक आणि व्यावहारिक कुटुंब व्यवस्थेशी अतिशय जवळचा संबंध आहे. जे नाटकात प्रत्यक्ष काम करतात ते तर त्या भूमिका जगतच असतात, आणि ते त्या जितक्या उत्कटपणे जागवतात तितक्या प्रेक्षागृहातील प्रेक्षकांना जगायला भाग पाडतात.
नाटकात मनोरंजनाबरोबर शिक्षण आणि संस्कार हेही घटक तितकेच महत्वाचे असतात.
विचारवंत दिग्गज लेखकांनी मांडलेले मौलिक-लाक्षणिक विचार; त्यांची भाषा, दिग्दर्शक आपली कुशाग्र निरिक्षण बुद्धी आणि कसब पणाला लावून अभिनेत्यांत उतरवतो. "पात्रांची बॉडी लँग्वेज, त्याचा पोषाख, चेहर्‍यावरचे हाव भाव, शब्दांचे स्पष्ट-शुद्ध उच्चार, वाक्यांची फेक, व्यक्तिरेखेनुसार आवश्यक ते शिष्टाचार, भावनांचा योग्य अविष्कार होण्यासाठी आवजाचे चढ-उतार, संभाषण चालू असतांना इतरांच्या चेहर्‍यावर उमटणारे तरंग-त्यांच्या सापेक्ष प्रतिक्रिया" ह्या सर्व गोष्टी "प्रसाराची विविध माध्यमं" असतात. ती अधिक प्रभावी होण्यासाठी अणि वातवरण निर्मितीसाठी "नेपथ्य, प्रकाश, संगीत, वेशभूषा, रंगभूषा" ही तंत्र वापरली जातात.
नाटकाची परिणामकारकता वृद्धिंगत करण्यासाठी, आधी सांगितलेल्या बाबींप्रमाणेच, "पात्रांची योग्य निवड, त्यांच्या रंगमंचावरील हालचाली, मंचावर ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा केलेला वापर, योग्य वेळी घेतलेल्या एन्ट्री-एक्झीट्स, वावरण्यातली सहजता" ह्या तितक्याच महत्वाच्या असतात. असो. पण हे झालं प्रेक्षकांसाठी ! आता ह्या सर्वांचा रंगकर्मींच्या दैनंदिन दिनचर्येवर कसा परिणाम होतो पहा.---
१) सर्व तंत्र व इतर समयोजित कलांची जवळून 'उपयुक्त' ओळख होते.
२) नृत्य, शिल्प, चित्र, रंग, प्रकाश, संगीत यांच्या सोबतच्या सततच्या वावरामुळे एक अस्वादक सौंदर्यदृष्टी तयार होते.
३) ज्येष्ठांचं लिखाण, श्रेष्ठांचं मार्गदर्शन यातून वागणूक-वृत्ती-भाषा-विचार सर्वच संस्कारित होतात.
४) नाटक जेंव्हा नाटक वाटत नाही तेंव्हा आपण त्याला खरा अभिनय म्हणतो. हाच आपल्या वागण्या बोलण्यातला नाटकीपणा घालवून आपल्या आचरणात सहजता आणतो.
५) रंगमंचाप्रमाणेच घरात देखिल, असलेली प्रत्येक वस्तू वापरली गेली पाहिजे अथवा ती तिथे असताच कामा नये अशी सुटसुटीतपणाची वृत्ती अंगी बाणते.
६) घर लावणे या प्रकारात सर्वसाधारण माणूस आणि अभिनेता / सहकारी / सहकलाकार यांच्यात लक्षात येण्याजोगा फरक असतो.
७) नाटकात जिथली वस्तू तिथेच असावी लागते; आणि ती हव्या त्या प्रसंगाला त्याच ठिकाणी उपलब्ध व्हावी लागते, हे नकळत, घरात आपोआप घडायला लागतं.
८) भूमिका करतांना नट ती प्रत्यक्ष जगत असतो. म्हणजेच लेखकाच्या विचारांची दिग्दर्शकाच्या दृष्टीतून संबंधित पात्रांशी देवाण घेवण करत असतो. असं करतांना ती सर्व पात्र आतून स्वानुभवत असतो, ज्याला मी "पर काया प्रवेश" असं म्हणतो, जो त्या व्यक्तिमत्वाविषयी आपोआप आस्था निर्माण करतो.
९) नाटकाच्या कुटुंबात प्रत्येकजण दुसर्‍यावर अवलंबून असतो, ही जाण रंगमंचाशी संबंधित प्रत्येक माणसाला असते. "सर्वांचा एकत्रित उत्तम मेळ म्हणजे उत्तम नाटक". हीच भावना अंगवळणी पडून घरातही / दारातही काम करते आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची समज वाढीस लागते.
१०) तत्काळ मूड बदलणे हे फार मोठं कसब असतं. मनातली वादळं दडवून निवळलेलं वातावरण निर्माण करणं सुलक्षण असतं. मागच्या क्षणाला काय घडलं हे पुढच्या क्षणाला समजू न देणं हे नाटकात पडल्यावरच येतं. एक रडका प्रसंग करून विंगेत गेल्यावर दुसर्‍याच एन्ट्रीला; फ्लॅशबॅकचा वेगळाच आनंदाचा सोहळा उभा करावा लागतो त्याच कलाकारांना, लोकांच्या मनावर क्षणापूर्वी ठसवलेलं गांभीर्य पुसून !! असं नाही झालं तर हे दोन वेगळ्या दिवसांचे वेगळे प्रसंग आहेत / होते हे प्रेक्षकांना पचणारच नाहीत. "अशा वेळी आपल्या व्यक्तिगत भावना अलिप्त ठेवणं" हीच "प्रॅक्टीस" असते.
११) प्रत्येक नाटक हे एक टार्गेट ओरिएंटेड प्रॉडक्ट असतं; आणि सर्व संच; ते यशस्वी करण्यासाठी एकाच देशेने एकाच ताकदीने आपली सर्व क्षमता पणाला लावून तत्परतेने काम करत असतो. एखादा जरी कुठे कमी पडला तरी नाटक अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. "असं रोमा रोमात भिनलेलं टीमवर्क, प्रत्यक्ष व्यवहारात खूपच सामंजस्य आणतं, आत्मविश्वास वाढवतं. "कामाची झिंग" नाटकच शिकवतं !!
१२) प्रत्येकाच्या निसर्गदत्त व्यक्तिमत्वाला अनुसरून, दिग्दर्शक, त्याच्याकडून त्यात्यानुरूप विविध प्रकारची प्रेझेंटेशन्स करवून प्रयोग करत असतो. त्यातूनच कलाकाराला, "त्याला साजरं कुठलं" हे नकळत कळायला लागतं. प्रेक्षकांचा सत्वर मिळालेला प्रतिसाद हेच त्याचं खरं प्रशस्तिपत्र असतं, कारण ते उत्स्फूर्त आणि निरलस असतं.
१३) "ज्ञान घेणं आणि ते सोपं करून सर्वसामान्यांना सहज कळेल असं देणं" हा तर नाटकाचा पायाच आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ आदि संतांनी हेच केलंय निराळ्या माध्यमातून !!
१४) नाटक हे एक मनन, एक चिंतन, आणि प्रसंगी मेडिटेशनही असतं यात कुठेही अतिशयोक्ती नाही.
व्यक्तिमत्व विकासासाठी अजून काय हवं असतं ? इतकं कुठे मिळू शकतं ? फक्त इथेच !!
म्हणून, हे 'आयुष्य जगून पावलेल्या कलाकारांचं', ज्या स्थानवर ते जगले आणि इतरांना जगवलं 'त्या स्थानाचं रंगमंचाचं', ज्यांच्यासाठी ज्यांच्यामधे जगले त्या 'रसिकजनांचं', ज्याच्या प्रेरणेनं हे साध्य शक्य झालं त्या 'रंगदेवतेचं- नटराजाचं' कृतज्ञ स्मरण-पूजन म्हणजे हा "रंगभूमीदिन" !!
ह्या व्रताला सामाजिक सौहार्दाची गरज आहे हे सांगण्याचा आणि समाजतल्या सर्व घटकांनी आवर्जून साजरा करावा असा हा दिवस !!
*******

Sunday, 20 May 2012

झालरी

झालरी वसने तरूंची मूक त्यांची स्नेहभाषा
जाणिवांच्या भावरंगी उन्मनी एकच दिशा
जे मिळे तेथेच देई अंबरी पायातही
गूढ नाते या चराशी अंतरी हळवी नशा

कोष गाभ्याचे कळे ना कोण विणतो साखरी
अंशकण मजला मिळावे आळवे निज वैखरी


..............................अज्ञात

Sunday, 13 May 2012

निवडुंग

रुतल्या कोर-कपारी दारी
अगणित वांछा संसारी
निवडुंग कुंपणी मी तैसा
चाकरी करी खडकाळ तिरी

निश्चल काटेरी खोड असे
माळल्या विशाखा संभारी
राखणे देखणे बहुतांचे
अंकीत होतसे सहज उरी

निरपेक्ष साधना जन्मभरी
जड देह उभा; जळ गाभारी
अवकाळहि माझा काळ नसे
मी चिरंजीव तव दरबारी

...............अज्ञात

Wednesday, 9 May 2012

चिरजीवीत कहाणी

सरले ते पळ,......मन भरुनी
जपले सय समरांगण मी,.... ओल्या नयनी
ओतीत मधाळ पखाली;.... मनमानी
हिंदोळा झुलवित,.... खेळ खेळतो कोणी

ही भातुकली;.. डोळ्यात आणते पाणी
कधि गतवचनांची स्मरते आणीबाणी
विखुरल्या कथा परि पंख पेरते राणी;..
शब्दात नाहते; हृदयस्वरांची; बिंबित अबलख वाणी

बहु मुळे तळाशी दुर्वा शिरी ठिकाणी
मोगरी कळ्यांची गंधित सवेस वेणी
लाटेस किनारा; किनार्‍यालगत; अगणित; व्रत लेणी
ह्या खुणा जपाच्या;.... चिरजीवीत कहाणी

............................अज्ञात

Friday, 4 May 2012

अंदोलने

पाहून कंठ दाटे लागे तरंग भंगू
काठांस पापण्यांच्या जळपात पाहि लंघू
हे अस्त्र नयनबाणी शब्दात काय सांगू
घायाळ वृश्चिकाचे नांगीत वीष पंगू

ओठांस माणकांची आलेपने फिरंगी
गाली गुलाबमाया स्मित रेशमी सुरंगी
काट्यास आकळे ना ममता उलाल अंगी
अंदोलने सुखाची व्यापून अंतरंगी

अस्पर्श गोत न्यारे गेले विरून वारे
चहुओर रजतकांती आनंदघन पसारे
हळव्या सुरात हलके गंधर्व गीत भारे
गंधात जाणिवांच्या अस्तित्व विलय सारे

............................अज्ञात